मूळ प्रकाशन: राग - सुरपाखरू साहित्य
महिन्यापूर्वी ” हास्य ” विषय घेऊन लिहीत असताना मनात विचार आला सर्व गुणाचे दिवस मनावले जातात जसे की हास्य दिन , मैत्रीदिन प्रेमदिन आदी…पण अवगुण जसे की सर्व षडरिपू जे प्रत्येकात काही अंशी आहेत त्याबद्दल फारच कमी चर्चा होते.
आज त्या पैकी एक *राग* हा विषय घेऊन लिहीतो आहे..आंतरराष्ट्रीय राग दिन (Anger Day) असल्याचे ऐकीवात नाही.
बऱ्याच वेळा अगदी छोट्या छोटया कारणामुळे राग येतो… भाजीत मीठ नाही पासून.. कोपऱ्यात केर तसाच आहे.. जोडीदाराने अंथरुणाची घडी घातली नाही इत्यादी अनेक साधे साधे विषय सुद्धा रागावण्यासाठी पुरेसे असतात.
गम्मत म्हणून सांगतो, “काही जणांच्या मते पाणी नेहमी बसून प्यावे आरोग्यदृष्टया ते हितकारक आहे असे म्हणतात…. या समजात आस्मादिकांची सौंभाग्यवती पण आहे…चुकून पाणी पिताना मी उभा असलो तर खाली बसायच फर्मान येते.. वाद टाळण्यासाठी मीही ते पाळतो.”
मनात या अंधश्रद्धेविषयी राग असला तरी कुणाचे नुकसान न होत असल्याने.. कुटुंब आनंदी ठेवण्यासाठी, तो न व्यक्त करता दुर्लक्ष करणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.
प्रत्येक बाबतीत वेगळी मते असू शकतात मतभेद झाल्यास राग टाळता येणे गरजेचं आहे. नाही तर संवादाचा वितंडवाद केव्हा होईल सांगता येत नाही.
मला राग येत नाही असे छाती ठोकपणे कुणी सांगत असेल तर नक्की खोटा बोलतो आहे.
मनाविरुद्ध घडलेली कोणतीही गोष्ट राग निर्माण करते..
तो तुम्ही कसा व्यक्त करता यावर तुमचे व्यक्तिमत्व अवलंबून असतें.
१. काही जण रागावले तर भांडण करून मोकळे होता शब्दाला शब्द वाढून कडक्याचे भांडण होते कदाचित अशी मंडळी कायमचा अबोला वा दुश्मनी घेऊन बसतात.
२. काहीजण मात्र तो मनात रुजवतात आणि कायम डुख धरून असतात पण समोर तसें दिसत नाही पण वेळ आली की वचपा काढतात.. अगदी हितचिंतक मित्र वाटणारा सुद्धा मनातून कट्टर शत्रू असतो. ही मंडळी खूप घातक असतात.. त्यांना वेळीच ओळखले नाही तर
“दुष्मन न करे दोस्तने
वो काम किया या
उमरभरका गम हमे
इनाम दिया हैं “
असे म्हणण्याची पाळी येते.
३. काहीजण मात्र विसरभोळे वा क्षमाशील असतात झालेले अपमान, कुणी दिलेले दुःख ही जगराहटी आहे असे समजून सहज विसरू शकतात ही मंडळी ऐहिक दृष्ट्या नेमस्त म्हणून समजली जात असली तरी आनंदी असतात आणि यांचा मित्र परिवार ही खूप मोठा असतो. बहुतेक जण स्वतःला या कॅटेगिरीत समजत असलो तरी रागावर नियंत्रण नसले तर वरच्या दोन भागात केव्हाही रवानगी होऊ शकते.
“लगे रहो मु्न्नाभाई!!” या चित्रपटामध्ये गुलाबाचे फुल देऊन बोमन इराणीचे मत परिवर्तन करणारी गांधींगिरी ही राग नियंत्रण ठेवण्याची एक प्रक्रिया आहे…
तर
मुन्नाभाई एम बी बी एस! मध्ये मेडिकल कॉलेजच्या डीनच्या भूमिकेत बोमन इराणी रागावर कंट्रोल करण्यासाठी हास्य थेरपी वापरताना दिसतात..
प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असली तरी राग नियंत्रणात असणे गरजेचे आहे नाही तर… रागाने हार्टऍटक आला वा ब्रेन हॅमरेज होऊन जीवावर बेतल्याच्याचे दुर्दैवी प्रसंग घडलेले आपण बघतो..
मग सर्व चर्चाही करतो की ” त्याचे रागावणे काय भावात गेले?” इत्यादी…. पण लागलीच स्मशान वैराग्याप्रमाणे सारे विसरून… रागावण्यास भांडण्यास परत तयार होतो!!!
आमचे आजोबा म्हणायचे, “राग येणे स्वभाविक आहे पण त्वरित रिऍक्ट करणे घातक असतें.. अशा वेळी बहुतेक वेळा वागताना चुकच होते…उलटे दहा अंक मोजा वेळ गेल्यावर राग निघून जाईल.”
खरंतर एकमेकांबरोबर रोज आशिलांसाठी बाजू मांडतांना कडकडून भांडत असतानासुद्धा ते सहव्यवसायिकात आणि इतरत्रही जगतमित्र होते अगदी विरोधीपार्टी पण त्यांचा आदर करायची कारण राग हा शब्दाला थारा त्यांचे शब्दकोशांत नव्हता.
असो..
संगीतातील “राग ” मात्र कानांना हवाहवासा वाटतो!!
मराठीतील दोन अक्षरी शब्द एकच असला तरी विरोधाभासी अर्थ असलेला एक हवाहवासा तर एक नकोसा वाटणारा…!!
माझे मित्र गोदावरी मेडिकल कॉलेजचे डीन यांनी “संगीतातील रागाचा शारीरिक स्वास्थावरही परिणाम होतो!!” त्याचे अभ्यासपूर्ण म्युझिक थेरपीचे व्याख्यान नुकतेच ऐकले असताना, काही दिवसापूर्व फॉरवर्ड केलेली पोस्ट *”Fragnant Raggas”* बघण्यात आली.”सुगंधित राग” ही एक अभूतपूर्व, संकल्पना आहे जी भारतीय शास्त्रीय रागांच्या भावनिक शक्तीला सुगंध, दृश्य आणि स्पर्शाच्या जगात मिसळते – खरोखरच एक तल्लीन करणारा, बहु-संवेदी अनुभव निर्माण करते.
संगीतातील रागावर वेगळा लेख लिहू शकणारी आपल्यात जाणकार मित्रमंडळी आहेत. मी फक्त कानसेन आहे जाणकार नाही त्यामुळे संगीतातील रागावर भाष्य करत नाही.
राग येण्यासाठी आहेत
कारणे जरी खूप अनेक
दुर्लक्ष करा हो त्याना
करा फक्त्त प्रेम अनुराग !!
स्वरांची नेमकी ती रचना
त्यालाही म्हणतात राग
पुन्हा ऐकू किती तयाला
तृप्त न जाहले ते कान !!
राग,क्रियेची प्रतिक्रिया
अपेक्षांचा होता भंग..
नुकसान रागवणाऱ्याचे
समोरचा मात्र निसंग !!
नाकावर ज्याच्या असतो
कधी कधी जेव्हा राग
सुंदरता नष्ट सारी होते
नाक होते लालीलाल !!
खूप रागवून का कुणावर
कोणाचे काय भले झाले
फरक नाही काही पडला
हार्ट बिट उगाच वाढले !!
न रागावता समोर बसवून
समजवा जे तुम्हा वाटे..
तारसप्तक नको स्वरांचा
शांततेने थंड समजावणे !!
दिसता काही चुकीचे
कर्तव्य फक्त्त ते सांगणे
चुक का ते बरोबर
प्रत्येकाचे विचार वेगळे !!
राग मनी जेव्हा येता
अविचार जन्म घेतो.
शत्रूत्व उगाच ते येते
मित्र आप्त तो दुरावतो !!
साखरेची गोड गोळी
जिभेवर नित्य ठेवा..
मनावर ठेवा नित्य ताबा
रागाला नका देऊ थारा !!
दूर जाऊनी स्वतःपासुनी
बोला स्वतः हो स्वतःशी
का होतो रागावला उगाचच
प्रश्न पडेल तुम्हा मनाशी !!
निरोगी आणि राग विरहित.. निर्मळ आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा!!
🙏🙏🙏
✍️हेमंत नाईक
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६
