संत नामदेव

मूळ प्रकाशन: संत नामदेव - सुरपाखरू साहित्य

मनाला पुसावे आपुलिया
पापाचे संचित देहासी दंडण।
तुज नारायणा बोल नाही॥१॥
भावार्थ -आपण वारंवार विचारतो ,” माझ्याच आयुष्यात इतक्या समस्या का?”परंतु तटस्थपणे स्वतःच्या आयुष्याचे मुल्यमापन केले, तर लक्षात येईल की आपल्या चुकीच्या सवयी,घेतलेले चुकीचे निर्णय,वेळेचा अपव्यय आणि आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष याचेच हे संचित फळ आहे.आपण दोष देवाला किंवा नशिबाला,पण यात ' नारायण 'यांचा काहीही संबंध नाही.हा सृष्टीचा साधा नियम आहे की आपण जे पेरतो, तेच उगवते.
सुख अथवा दुःख भोगणे देहासी।
सोस वासनेशी वाउगाची॥२॥
अर्थात -' वासना ' म्हणजे केवळ इंद्रियभोग
नाहीत,तर सोशल मिडियाचा अतिवापर ,नको असलेली तुलना आणि अवास्तव अपेक्षांचे जाळे पण आहे.दुस-याचे आभासी(भौतिक)सुख/जीवन पाहून स्वतःला कमी लेखणे ही आजची मोठी वेदना आहे.दु:आ हे कधीच बाहेरून येत नसतं ते आपल्या भरकटलेल्या चित्तातून व अतृप्त अपेक्षांमधून जन्माला येते.त्यासाठी आपल्या मनाला आवरणे गरजेचे आहे.
पेरि कडु जीरें इच्छी अमृतफळ।
अर्किवृक्षा केळी येती कैंच्या॥३॥
अर्थात –माणसाला कष्टांशिवाय यश हवे आहे, गुंतवणुकीशिवाय परतावा हवा आहे आणि नात्यात गुंतवणूक न करता प्रेम हवे आहे.रूईचे झाड लावून केळाची अपेक्षा करणे मुर्खपणाचे आहे तसेच चूकीच्या मार्गाने जाऊन सुखाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.वाईटातून चांगले कधीच निर्माण होऊ शकत नाही.
मुसळाचे धनु न होय सर्वथा।
पाषाण पिळिंता रस कैंचा॥४॥
प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट शोधण्याची प्रवृत्ती वाढली आहे.आपण अशा ठिकाणी सुखाचा शोध घेतोय ,जिथे त्याचा लवलेशही नाही.खडक कितीही धुतला तरी तो मृदू होईल का ?आणि पिळला तर त्यातून रस निघेल का ?जिथे शक्यताच नाही तिथे अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःच्या विवेकाची फसवणूक करणे आहे.
नामदेव म्हणे देवा का रूसावे।
मनाला पुसावे आपुलिया॥
अर्थात –आपण दुस-यांचा,तज्ञांचा सल्ला घेतो वेळ पडली तर गुगलचा पण सल्ला घेतो.किंवा दोषही देतो.पण कधी स्वतःच्या आत डोकावून पाहिले आहे का?खरा बदल बाहेर नाही ,तो आत्मचिंतनातून सुरू होतो.आपले मनच आपल्याला सांगत असते की आपण कुठे चुकतोय, फक्त ते ऐकण्याची तयारी हवी.जीवन
बदलायचे असेल ,तर देव नशिब किंवा परिस्थितीची वाट पाहू नका.आपल्या सवयी, विचार आणि निवडी बदला.कारण शेवटी आपले आयुष्य हे आपल्याच निर्णयांचे प्रतिबिंब असते.
सौ ऐश्वर्या डगांवकर पुणे
भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५