तुम्ही जे समजतात..तो मी नव्हे !!

मूळ प्रकाशन: तुम्ही जे समजतात..तो मी नव्हे !! - सुरपाखरू साहित्य

*तुम्ही जे समजतात..*
*तो मी नव्हे !!* 
✍️हेमंत नाईक 
दोन जेव्हा दिसें सारखे
साम्य त्यांस म्हणता रे
गुण दोषानी असे विभिन्न
जगती सत्य ते असते रे
सामान्यातूनच असामान्यत्व
कर्तृत्वा व्यक्तिमत्व घडते रे 
असामान्याचे सामान्यत्व 
खरे असामान्यत्व असतें रे
विलक्षण सत्यकथा ही
माझ्या लहानपणी घडलेली 
असामान्यत्व काय असतें ते
क्षणिक सामान्यास जाणवली
वडील पेशाने वकील असल्याने भुसावळ, जळगाव,रावेर,यावल आदी ठिकाणी कोर्टात दावे चालविण्यासाठी जाणे येणे असायचे..१९७०ते ७५ चा काळ..त्यावेळी कार वा स्कुटर्स कमी होत्या त्यामुळे सर्वं वकिलांचे वाहन म्हणजे सार्वजनिक एस.टी.
सर्वं जण एकमेकांच्या विरोधात जरी आशिलासाठी लढत….कोर्टात शस्त्र जरी नसले तरी शाब्दिक लढाई होत असल्याने हा शब्द वापरत असावेत …
कोर्टात माझे *हुशार मित्र* असे जेव्हा विरोधी वकिलास संबोधता तेव्हा ती हुशारी नसून मुर्खता असतें हे सुध्दा पण ध्यानात घेण्यासारखे आहे..
असे सर्व असले  सर्वांची युद्धभूमी ही कोर्ट रूमपर्यंत सिमीत होती बाहेर सर्वं मित्र होते, विद्वान मंडळी एकमेकांसोबत एस. टी. त गप्पाटप्पा मारत आशिलाच्या केससाठी बाहेर गावी जात असत.
अशाच एका सोमवारी रावेर येथे कोर्टात एका आशिलाचे तारीख चौकशीला असताना, वडील घरातून गडबडीत निघाले… बस स्थानक दुर होते पण त्यावेळी काळ्या कोट धारकाने हात दाखवला तर बस थांबावली जात असे अशाच एका बसला हात दाखवून त्यात वडील चढले.आधीच वेळ झाला होता..
साहेबाने केस चालवावी अशी इच्छा जरी प्रत्येकाच्या मनात असली तरी ती प्रत्यक्षात येत नाही.. ज्याची बाजू कमकुवत असते तो काहीही करून केस लांबवत असतो..आणि मग तारीखांवर तारखा आणि आशिलाचा मानसिक छळ असा काहीसा न्याय मिळविण्याचा, अंध न्यायदेवतेपुढचा प्रवास बघून, “शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये” अशी म्हण पडली असावी..
म्हणजे कोर्टात जाता ते वेडे असता का?.. तसें नाही ते नाईलाजाने खेचले जातात..
खऱ्याच खोटं आणि खोट्याच खरं करणारे म्हणजे वकील मंडळी असा बऱ्याच जणांचं किंबहुना सर्वांचेच मत असत… प्रत्यक्षात वकील त्याच्या आशिलाची बाजू मांडत असतो .. जस नाण्याला दोन बाजू असता तसंच काहीच प्रत्येक घटने बाबत असत… अगदी स्वसंरक्षणासाठी केलेल्या डिफेन्स मधून चुकून हत्या झाली तर तो खून कसा नाही? हे प्रभावीपणे सिद्ध केल्यावर..जेव्हा आरोपी निर्दोष सुटतो तेव्हा बळी जाणाऱ्या व त्याच्या नातेवाईकांसाठी तो अन्याय वाटतो आणि मग ज्यूडिशरी बरोबरच वकीलास ही व्हीलन करण्यात येते..असा हा न्याय मिळवून दिल्यावर विजेते झाल्यावरही दुसऱ्या पार्टी कडून शिव्या..प्रसंगी कायमचा वाईटपणा येणारा हा व्यवसाय..
केसचे विचार डोक्यात येत असताना बस रावेरला पोहचली, दादांनी लागलीच खाली उतरून कोर्टाकडे धाव घेण्यास सुरुवात केली.. त्यावेळी कसल्या रिक्षा.. काही टांगे असायचे पण दुर्दैवाने ते ही नव्हते.. मग विनोबा भावे यांचे शिष्य असल्यागत रावेर बसस्थानक ते कोर्ट ही पदयात्रा सुरु झाली…
मग लक्षात आले की दोन मंडळी त्यांचा पाठलाग करीत होती..दादा थांबले की ते ही थांबायचेत.. दादांनी त्यांना वळून बघितले..मग त्यांच्या लक्षात आले की ही दोघे जण साधारण चाळीस वर्षाची माणसं बस मध्ये देखील मागे बसली होती आणि सारखी कुजबुज करीत होती.
त्याकडे लक्ष न देता कोर्टात वेळ होतो आहे हे जाणून दादांनी चालण्याचा वेग वाढवला तसा त्यांनीही वाढवला..
आता मात्र आपला पाठलाग करता आहे हे लक्षात येत होते, मग दादा हळू चालायला लागले. त्यांचे बोलणे आता कानी पडू लागले होते.
“अरे तू विचार..”
“नाही, माझी हिम्मत होत नाही माधव.”
“तूच विचार… पण नक्की तेच असतील का रे?
“१०० टक्के सांगतो तेच आहेच मागील वर्षी पुण्याला गेलो तेव्हा कार्यक्रम बघितला.”
आता मात्र दादांचा पेशंन्स संपला.
तात्काळ मागे वळून वकीली करड्या शब्दात, ” काय काम आहे तुमचे? आणि माझा पाठलाग का करताय? ” विचारताच..
“सॉरी साहेब, तुम्हाला आम्ही ओळखले आहे आपण पु ल देशपांडे ना?”
आम्ही रावेर येथे हायस्कुल टिचर. आहोत…
“साहेब, नाही म्हणू नका पण तुमची चरणकमल आमच्या शाळेत येऊ द्यात .. आम्ही धन्य होऊ.”
आता मात्र दादांना हसू आवरेना..
“मित्रांनो,  तुम्ही मला जे समजता, “तो मी नव्हे!!  तुमच्या प्रमाणे पु.ल.हे माझंही आराध्यदैवत आहे..”
एवढी मोठी व्यक्ती बस ने कशी येईल ही साधी बाब शाळेच्या मास्तरांच्या लक्षात आली नव्हती….
काही क्षणासाठी का होईना पु. ल.च्या डमीचे रोल करून दादा आनंदले होते.. . दादा जाऊन आता पंधरा वर्षे झाली.
पण ही
सामान्यांच्या आयुष्यातील क्षणिक असामान्यत्व देणारी…ही कथा आज आठवली आणि लिहिली गेली.
(ती. कै. दादा,  माझे वडील जे दिसायला काही अंशी पु लं सारखे दिसायचेत ..असे माझ्या शालेय जीवनात धड्यातील सुरवातीचे पु. ल. चे चित्र पाहून माझे मित्र,  मला सांगायचेत.. त्याच्या जीवनात घडलेली ही सत्यकथा )