मूळ प्रकाशन: अर्धा तास - सुरपाखरू साहित्य
भाग चौथा
रिक्षात बसलेल्या सानिकाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.तिला त्या पुस्तकाचे गूढ काही केल्या उमजत नव्हते.
पुस्तक कोणते ?
मला का दिसले?
मग अचानक कपाटातून नाहीसे झाले…
दुसऱ्या दिवशी माझ्या टेबलवर दिसले….
तो आशिषचा वाटलेला फोन…आशिषचा फोन न केल्याचा खुलासा….
हे काय सुरू आहे…काय करावे आता…
रिक्षा थांबला.ती खाली उतरली.समोर काही पावले चालत गेली.तिला आठवले…रिक्षाचे पैसे द्यायचे राहिले…ती मागे वळली.रिक्षा निघून गेला होता.
ती परत फिरली.समोर चालत गेली.नजर वर गेली तर जिथे ती आली ते वेगळेच घर होते.आपण इथे का आलो?
तिला काहीच कळेना.
ती भारल्यागत आत गेली.आत थोडा उजेड बाकी अंधार होता.नीट ठेवलेले साधे घर.समोर सोफा.एक वाचनाचे मेज.लाकडी खुर्ची.मेजावर पाण्याचे तांब्या भांडे.एक चष्मा आणि एक पुस्तक व पेन.सानिका पुढ्यातल्या खुर्चीवर बसली.तिला खूप तहान लागली होती.तिने तांब्यातले पाणी भांड्यात ओतले. एका दमात तिने भांडभर पाणी पिले.थोडे बरे वाटले तिच्या जीवाला.तेवढ्यात आतल्या खोलीतून चपला घालून कोणीतरी चालत येत असल्याची चाहूल लागली.ती सावध झाली.तिला एक क्षणभर वाटले की तिथून वेगाने पळून जावे.पण दुसऱ्या क्षणी आता काय होईल ते होवो.बघूच.असे तिचे अंतर्मन म्हणाले.
….कधी कधी एखादा निर्णय घेताना त्यामागे कोणती प्रेरणा असते…आपल्यालाही कळत नाही.पण तो निर्णय अगदी पक्का असतो…इतका पक्का की तो आपल्यालाही बदलवता येत नाही…
असेच काहीसे सानिकाचे झाले.ती सावधपणे पण काहीश्या भीतीने आवाजाचा अंदाज घेत होती.दोनच क्षणात आतल्या खोलीतला पडदा हलला आणि एका व्यक्तीने बैठकीत प्रवेश केला.त्या व्यक्तीला बघून सानिका निःशब्द…!
क्रमश:….