पहिली भेट मला जिवाभावाची मैत्रीण देऊन गेली

:tulip::tulip: विषय : पहिली भेट :tulip::tulip:

भेट तिची आणि माझी

ती आणि मी आम्ही दोघीही दहा वर्षाच्या . नव्या शाळेत पाचव्या वर्गात अ‍ॅडमिशन घ्यायला एकदमच आलेल्या . शाळेचे मुख्याध्यापक अजून आले नव्हते . ती जिल्हापरिषदच्या शाळेतून आलेली आणि मी मुलींच्या शाळेतून. दोघीही को-एज्युकेशन असलेल्या शाळेत शिकायला आलेलो. आमच्या दोघींचेही वडील मस्त गप्पा मारत होते आणि आम्ही त्या एव्हड्या मोठ्या शाळेच्या दालनात दोघीच जणी आउट आउट खेळत होतो. किती मस्त फुलपाखराच आयुष्य होत. त्या दिवशी झालेली भेट मला जिवाभावाची मैत्रीण देऊन गेली.

:tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip:

एकमेकींच्या घरी जात राहिलो . राहत होतो , बरोबर अभ्यास करत होतो. कध्धी कध्धी भांडलो नाही . हायर मॅट्रिक झालो. आमच्या दिशा बदलल्या. तिने आर्टस् घेतले , मी सायन्स. ती प्रायव्हेट शिक्षण घेत होती , मी कॉलेजला जात होती. पण कॉलेज सुटले की अर्धा तास तरी तिच्या घरी जाऊन गप्पा मारल्याशिवाय मी कधीच घरी गेली नाही. अगदी घरच्यांच्या ओरडण्याचा आमच्या गप्पांवर कधीच परिणाम झाला नाही .

:tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip:

तारुण्यात पदार्पण केले . तिचे लग्न ठरले. ती संसारात रमली. तेंव्हा आजच्यासारखे मोबाईल फोन नव्हते . एकमेकाशी संपर्क कसा साधायचा ? पत्र पाठविण्या शिवाय दुसरा मार्ग नव्हता . पण तिच्या घरी चालेल का ? तरी एक दोन वेळा तिच्या माझ्या पत्रातून गप्पा झाल्या .

:tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip:

ग्रॅज्युएशन नंतर माझे रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन, भोपाळला सिलेक्शन झाले. मी भोपाळला बी. एड. करायला निघून गेली. मी अभ्यासात आणि ती मुलाबाळां मधे रमली. पत्रव्यवहार थोडा मंदावला. मी बी.एड. झाली , माझेही लग्न झाले. नेमक्या माझ्या लग्नाच्या वेळेला तिच्या घरी जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. माझ्या लग्नाला ती नाही येऊ शकली. खूप खूप वाईट वाटले . पण तिचा नाईलाज होता .

:tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip:

माझे सासर म्हणजे एकत्र कुटुंब . जबाबदार्‍या पार पाडता पाडता आमचे संबंध दुरावत गेले. पण मने मात्र जुळलेली होती . ती माझा आणि मी तिचा शोध घेतच होतो. मोबाईलचा जमाना आला. ती फेसबुक वर मला शोधत होती . पण मी फेसबुक वर ॲक्टीव नव्हती . सापडणे शक्यच नव्हते .

:tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip:

अचानक एक दिवस माझ्या लहान बहिणीचा फोन आला , " अग मंजू ताई, फेसबुक वर सुशीला ताईची फ्रेंड रिक्वेस्ट आहे मला. तू पटकन फेसबुक वर तुझा अकाऊंट उघड ."

:tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip:

माझा आनंद पोटात मावत नव्हता . मग फोनाफोनी, भेटण्याच्या आणाभाका आणि मग पाच वर्षापुर्वी आमची पुन्हा भेट झाली अगदी पहिल्या भेटी इतकीच जिवंत भेट.

:tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip:

आज पंचावन्न वर्षे झालीत आमची मैत्री टिकून आहे. एकमेकींशी संवाद चालूच असतो . बोलण्याचे विषय बदलले तरी ओलावा तोच आहे . तेव्हाची फुलपाखराची मैत्री आज एकदम परिपक्व मैत्रीत बदलली आहे.

:tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip::tulip:

सौ मंजूषा श्रीकांत अपराजित

सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६