मूळ प्रकाशन: #30 दिवसात 30# प्रयोग जुलै 2026 - सुरपाखरू साहित्य
संत सोयराबाई (भाग २)
चोखोबांच्या कुटुंबातील स्वतः चोखामेळा,बायको सोयराबाई,बहिण निर्मळता, मेहुणा डंका,पुत्र कर्म मेळा सारेजण जातिव्यवस्थेला प्रश्न विचारणारे होते.चोखोबांनी विठ्ठल दर्शनाची आस धरली म्हणून बडव्यांनी त्यांना कोंडून मारून त्यांची चामडी लोळवली पण तरीही तो विठोबाला प्रणाम करीत,
'जोहार मायबाप जोहार ' म्हणत राहिला तेव्हा सोयराबाईंनी विठ्ठलाला साकडे घातले,
' आमची तो दशा विपरीत झाली।
कोण आम्हा घाली पोटामध्ये॥
आमचे पालन करील बा कोण।
तुजवीण जाण दुजे आता॥
शूद्रांना विठ्ठलाचे दर्शन घेऊ देत नाही आणि यांना त्याच्या पायरीशीच लोक ठेवतात .याचे सोयरसुतक पण नाही म्हणून त्या परखड शब्दात विठ्ठलावर रागही प्रकट करतात,
' का बा उदारा मज केले।कोण म्हणे तुम्हां भले॥
आम्ही बैसलासे दारी।दे दे म्हणोनी मागतो हरी॥
घेऊन बैसलासे बहुतांचे।गोड कैसे तुम्हा वाटे॥
ही नीत नव्हे बरी।म्हणे चोखियाची महारी॥'
परंतु राग निवळल्यावर पुन्हा म्हणते,
' सलगीने बहु बोलिले उत्तर।परि तुम्ही उदार मायबाप 'सर्व संतांची ही विशेषता होती की त्या विठ्ठलात मायबापाचे रूप पहात त्यांच्याजवळ तक्रार पण करत रागवत आणि मग लाडीगोडी पण लावत.विठ्ठलाबद्दलची आपुलकी वारंवार तिच्या अभंगातून दिसून येते.त्या म्हणतात,
'आम्ही ज्ञातीहीन होतो.पण उच्च कुळातील ज्ञानेश्वरांना पण या सनातनी लोकांनी काय काय करायला लावलं ! चोखोबा हातातल्या झाडूने गावकुस साफ करत आहेत तसंच विठ्ठल नामाने सामाजिक स्तरावर उच्चवर्णीयांच्या विकृत मानसिकतेला देखील स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत होते.धनी जेव्हा पंढरपूर ला जात असत तेव्हा महाद्वारापाशी लांब असलेल्या माझ्या धन्याला उच्चवर्णीयांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असे.ते म्हणत की ए चोख्या,लांब उभा रहा .अरे तुझी सावली पडली तर विठ्ठलाला विटाळ होईल 'असं म्हणून त्यांचा पाणउतारा केला जाई.तेव्हा मला वाटायचं ', विठ्ठल हा तर परिपूर्ण शुद्धतेचा पुतळा जो सा-या दीन जनांचा पतित जनांचा उद्धार करतो
मग त्याला कुणाच्या सावलीने कसा काय विटाळ होईल?'पुढे त्या सांगतात ,' एक दिवस स्वतः विठ्ठलच माझ्या धन्याला घेऊन राऊळात गेले.महाद्वारापाशी ताटकळत उभ्या असलेल्या माझ्या धन्याची भक्ती फळाला आली होती.विठ्ठलाने प्रेमाने स्वतःच्या गळ्यातली तुळशीमाळ माझ्या धन्याच्या (चोखोबांच्या)
गळ्यात घातली.त्या आनंदाच्या भरात धनी राउळाबाहेर आले आणि कसे कुणास ठाऊक
पायरीवरच झोपी गेले.पूजेला आलेल्या पुजा-याने ते पाहिलं आणि त्या ब्रह्मवृंदाचा संताप अनावर झाला.त्याने शिव्यागाळ्या केल्या.मला मात्र धडा मिळाला सात्विक भाषेसाठी उच्चवर्णीय असणे गरजेचे नसते.त्याच दिवशी ब्रह्मवृंदांनी चोखोबांना बैलांच्या शिरवळीला बांधून बैल उधळून लावायचे अशी शिक्षा देण्याचा प्रयत्न केला.धन्यांनी ,' धाव घाली विठू आता चालू नको मंद 'असा आर्तपणे टाहो फोडला.मी पण ते पाहून जनाबाई सारखीच विठूवर कडाडले,
' निलाज-या ,तुला लाज वाटत नाही का?तू आल्यावर मोठ्या प्रेमाने मी तुझ्यापुढे दह्याची वाटी ठेवते.तू मात्र माझं कुंकू पुसायला निघालास का ?'परंतु निजानंदाची समाधी लागलेले माझे धनी त्याचवेळी माझ्यावर कडाडले ,” सोयरा ,कशापायी तू त्याच्यावर रागावतेस गं? विश्वाचा पोसणा,संतांचा देखणा हरी माझा' तो बघ माझा विठ्ठल हातात बैलाचे शिरवळ घेऊन उभा आहे.अख्ख्यापंढरपूराने ते दृश्य पाहिलं.धन्याला शिव्याशाप देणा-या ब्रह्मवृंदांचे चेहरे काळे ठिक्कर पडले होते.
शेवटी त्या म्हणतात ,' महाद्वारापाशी माझ्या धंद्यांना तू कायमस्वरूपी स्थान दिलंस मी धन्य
झाले.विठूराया ,अखिल मानव जातीकरिता तुझ्याकडे आता एकच मागणे आहे यापुढे कुठल्याही चोखोबाला महाद्वारापाशी ताटकळत उभे रहावे लागू नये ,असे कर .हे विठूराया ,माझ्या या विनवणीचा तू अव्हेर करू
नकोस एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना!'